Tuesday, March 22, 2011

’शहीदे आलम’ भगतसिंग

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग(सप्टेंबर २७, १९०७ - मार्च २३, १९३१) लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीदे आलम’ असा किताब दिला जातो.एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त अशी अनेक रुपे या महायोग्याचे जीवनचरित्र वाचताना दिसून येतात. अत्यंत ज्वालाग्रही पण अत्यंत शांत. अत्यंत निग्रही पण तितकेच हळवे. अत्यंत तडफदार पण उतावळे नाहीत. अत्यंत कणखर पण तरीही विनम्र. स्वातंत्र्य देवतेला सर्वस्वाचा नैवेद्य दाखवूनही निरीश्वरवादी राहिलेले. पुनर्जन्मावर विश्वास नसलेले पण तरीही पुन्हा याच देशात जन्माला येण्यास उत्सुक असलेले.जगात सर्वांत घोर पाप असेल तर ते म्हणजे गुलामी व दारिद्र्य असे ठामपणे सांगत देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतः:ला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.

भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते.सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक.ऑस्कर वाइल्ड्चे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांचे चरित्र, वॉल्टेर, रुसो,व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नामावली फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वा. सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी स्वा. सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनीन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

भगतसिंग हे एक पत्रकार होते व लेखकही होते तसेच उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लालाजींच्या मृत्यू नंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप','दुर्दशा','सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.
SACHIN AMBHORE, AURANGBAD.

No comments:

Post a Comment